लखीमपूरमध्ये काय घडलं नेमकं? व्हायरल व्हिडिओतील एका व्यक्तीने सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग
लखीमपूरमध्ये काय घडलं नेमकं? व्हायरल व्हिडिओतील एका व्यक्तीने सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग
(पूर्ण व्हिडिओ खाली दिला आहे)लखीमपूर खिरीः यूपीच्या लखीमपूर खिरीमध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा ( lakhimpur kheri incident ) मृत्यू झाल्यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका छोट्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती थार गाडीतून उतरून पळून जाताना दिसतोय. हे वाहन केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांचे आहे. हे वाहन आपले आहे. मात्र, त्यावेळी आपण घटनास्थळी नव्हतो, असा दावा आशिष मिश्रा यांनी केला आहे. दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओत थार कारमधून पळून जाणारी व्यक्ती आपणच आहोत, असा दावा सुमित जयस्वाल ( sumit jaiswal ) नावाच्या व्यक्तीने केला आहे. काय घडलं रविवारी त्यावेळी? हा सर्व प्रसंग जयस्वालनी कथन केला.
कार्यक्रमस्थळावरून (केशव प्रसाद मौर्य) यांचे स्वागत करण्यासाठी जात होतो. वाटेत आम्ही आंदोलकांमधून जात असताना काहींनी कार लाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर कारवर दगडफेक सुरू झाली. आडवा त्यांना... असे अनेक जणांचे आवाज येत होते. ती कार आशिष मिश्रांचीच होती. म्हणूनच आंदोलकांनी कारवर हल्ला केला. त्यांच्या हत्येचा कट रचला होता. एवढचं नव्हे तर वादग्रस्त घोषणा दिल्या जात होत्या, असा दावा सुमित जयस्वालनी केला.
पूर्ण व्हिडिओ
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना घेण्यासाठी मी निघालो त्यावेळी आशिष मिश्रा मोनू (केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा) हे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक आशिष मिश्रा होते. थारमध्ये मी आणि इतर तीन जण होते. एक चालक आणि इतर दोन कार्यकर्ते होते, असं जयस्वालने सांगितलं.
थार ही कार हरी ओम मिश्रा चालवत होता. आंदोलकांनी हरी ओम मिश्राची हत्या केली, असं सुमित जयस्वाल म्हणाला. एका व्हायरल व्हिडीओमध्ये थार कार आंदोलकांना चिरडत जाताना दिसतेय, त्यावरही सुमितने उत्तर दिलं. कार आधी हळूहळू चालत होती. पण जेव्हा आंदोलकांनी लाठ्याकाठ्या मारायला सुरवात केली, त्यानंतर वेग वाढला होता. यामुळे असं झालं असेल. आमच्याकडे कोणतीही शस्त्रे नव्हती. मी भाग्यवान ठरलो आणि वाचलो, असं जयस्वालने सांगितलं.
मी भाजपचा नगरसेवक आहे. मी निवडणूक जिंकली आहे. ज्या कारने काहींचा मृत्यू झाला, त्या कारमध्ये मी होतो. कारच्या चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. माझा मित्र शुभम मिश्राचीही आंदोलकांनी निर्घृण हत्या केली. दुसऱ्या, कारमध्ये असलेल्या इतर कार्यकर्त्यांचे काय झाले, मला माहित नाही. मी त्यांना चेहऱ्याने ओळखतो, त्याचे नावही माहित नाही. कसा तरी मी तिथून पळून गेलो, असं तो म्हणाला. ते लोक शेतकरी नव्हते. त्यांच्याकडे हत्यारं आणि लाठ्याकाठ्या होत्या. ते उपद्रवी होते, असं सुमितने सांगितलं.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे लखीमपूर खिरी जिल्ह्यातील तिकोनिया परिसरातील केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मूळ गावाला भेट देणार होते. याविरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी आंदोलकांना वाहनाने चिरडले आणि यानंतर हिंसाचार भडकला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी मिश्रा यांचा मुलगा आशिषसह एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source: maharashtratimes.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Comment